बॉलिवूडच्या इतिहासात काही नाती अशी असतात, जी जरी पूर्णत्वास गेली नाहीत, तरी लोकांच्या मनात कायम जिवंत राहतात. अशीच एक प्रेमकथा म्हणजे रेखा (Rekha) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachan) यांची! काळ पुढे सरकला, दोघांचे आयुष्य वेगळ्या दिशांनी वळले, पण त्यांच्या नात्याची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात ताजी आहे.
रेखा या बॉलिवूडपासून दूर राहत असल्या तरी त्या त्यांच्या जुन्या आठवणी, किस्से, आणि भावनांनी नेहमी चर्चेत असतात. एकदा त्यांनी एका मुलाखतीत ‘सिलसिला’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा एक खास किस्सा सांगितला, ज्याने पुन्हा एकदा जुनं प्रेम उलगडून दाखवलं.‘सिलसिला (Silsila)’ हा सिनेमा त्या काळी फारच गाजला. सिनेमात रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. याच सिनेमाच्या सेटवर एक दिवस असा होता, जेव्हा रेखा खऱ्या अर्थाने तुटल्या होत्या… आणि अमिताभ यांनी त्यांना सावरलं.
रेखांच्या म्हणण्यानुसार, सिनेमात एक अतिशय भावनिक सीन होता, जो जवळपास १५,००० लोकांपुढे शूट करायचा होता. त्या सीनमध्ये मोठे डायलॉग्स होते आणि रेखा थोड्या अस्वस्थ होत्या. म्हणून त्यांनी दिग्दर्शक यश चोप्रा (Yash Chopra) यांच्याकडे जरा वेळ मागितला, पण यशजींनी नकार दिला. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी रेखांची समजूत घालत एक प्रेरणादायी किस्सा सांगितला. ते म्हणाले, “जायंट या सिनेमात जेम्स डीन यांचीसुद्धा अशीच अवस्था झाली होती. लोकांसमोर अभिनय करताना त्यांना इतकं टेन्शन आलं होतं की त्यांनी मागं वळून लघवी केली! आणि म्हणाले यापेक्षा वाईट काय होणार?”
ही गोष्ट ऐकून रेखा हसल्या, आणि त्यांचं मन हलकं झालं. त्या म्हणतात, “सीन सुरू झाला, लोक शांत झाले आणि मी माझा सर्वोत्तम अभिनय केला. सीन संपल्यानंतर मी धावत गेले आणि अमितजींना मिठी मारली… तेव्हा सर्वजण थक्क झाले! रेखा सांगतात की त्या क्षणी त्यांना स्वतःच्या भावना रोखता आल्या नाहीत. तो क्षण त्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव बनून राहिला.
आज रेखा ७० वर्षांच्या असूनही एकट्याच आहेत. त्यांनी वैवाहिक जीवनात सुख कधी अनुभवले नाही. अनेक अभिनेत्यांसोबत त्यांचं नाव जोडलं गेलं, पण अमिताभ यांच्यासोबतचं नातं हे प्रेक्षकांच्या मनात कायम ‘अपूर्ण पण अमर’ असं राहिलं.