बॉलिवूडमधील प्रतिष्ठित आणि प्रभावशाली जोडप्यांपैकी एक म्हणजे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन. त्यांनी केवळ अभिनयाच्या दुनियेत नव्हे तर आपल्या कुटुंबाच्या संस्कारांमध्येही समतोल राखला आहे. त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन नंदा हे दोघेही कायम चर्चेत राहणारी आणि लोकांच्या नजरेत असणारी व्यक्तिमत्त्वं आहेत. मात्र, या लोकप्रियतेपलीकडे एक गोष्ट सतत आदर्श ठरली आहे ती म्हणजे बच्चन कुटुंबातील समानतेची मूल्यं.
एका जुन्या मुलाखतीत अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांनी त्यांच्या संपत्तीच्या वाटपाबद्दल स्पष्ट मत मांडले होते. त्यांनी सांगितले होते की, “माझ्या मृत्यूनंतर माझ्याकडे असलेली संपत्ती माझ्या दोन्ही मुलांमध्ये अभिषेक (Abhishekh) आणि श्वेता (Shweta) समान पद्धतीने वाटली जाईल. आम्ही हे निर्णय खूप आधीच घेतलेला आहे.” त्यांच्या या विधानातून त्यांच्या विचारसरणीचा स्पष्ट संकेत मिळतो मुलगी परकी नसते, तीही आपल्या वारसाहक्काची हकदार असते.
बच्चन कुटुंबाची एकूण संपत्ती ही (Hurun India Rich List 2024) नुसार सुमारे 1600 कोटी रुपयांहून अधिक आहे. या संपत्तीत मुंबईतील प्रॉपर्टीजपासून अयोध्या व पुण्यातील मालमत्तांचा समावेश आहे. ‘प्रतीक्षा’ नावाचा जुना बंगला, जो सध्या 50 कोटी रुपयांचा आहे, तोही श्वेता बच्चनला भेट दिला गेल्याचं जुन्या अहवालांमधून समोर आलं आहे. विशेष म्हणजे, याच बंगल्यात एक ‘म्युझिक रूम’ आहे जिथे विविध वाद्यसंग्रह आहे. याबद्दलही कौटुंबिक शो ‘केबीसी’ मध्ये जया बच्चन यांनी सांगितले होते. या संगीत खोलीबद्दल अमिताभ म्हणाले होते की, “ही खोली आता माझा नातू अगस्त्य याची आहे.”
आज वयाच्या ८२व्या वर्षीसुद्धा अमिताभ बच्चन हे अभिनयाच्या क्षेत्रात सक्रिय आहेत. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘कल्कि 2898 AD’ या चित्रपटात त्यांनी दमदार भूमिका साकारली असून, प्रेक्षकांच्या प्रेमाचा वर्षाव या चित्रपटावर झाला आहे.
एका आदर्श पित्यासारखे वागत, बिग बी यांनी आपल्या दोन्ही मुलांना समान मान देत, समाजासमोर एक सकारात्मक आदर्श ठेवला आहे. आजच्या काळातही अशा विचारांची गरज अधिक जाणवते. त्यांच्या या निर्णयामुळे अनेक घरांमध्ये समानतेचा विचार रुजेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.