भारताची अर्थव्यवस्था, जी सध्या ४ ट्रिलियन डॉलरच्या उंबरठ्यावर उभी आहे, ती आजही मोठ्या प्रमाणात शेतीवर आणि शेतीसाठी आवश्यक असलेल्या पावसावर अवलंबून आहे. देशातील सुमारे ७० टक्के भूभाग मान्सूनच्या पावसावर जगतो. मात्र दुर्दैवाने आजही अनेक भागांमध्ये सिंचनाची पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे शेतकरी दरवर्षी पावसाच्या लहरीपणावर आपली संपूर्ण शेती आधारित ठेवतो.
जून ते सप्टेंबर या काळात पडणाऱ्या पावसावरच खरीप हंगामातील शेतीचे भविष्य ठरत असते. यावर्षी २४ मे रोजी मान्सूनने केरळमध्ये प्रवेश करत आश्वासक सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर त्याची गती मंदावली असून सध्या देशातील अनेक भाग उष्णतेने होरपळत आहेत. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील ९ दिवस अजूनही उकाड्याचे राहणार असून, ११-१२ जूनच्या सुमारास मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्यानुसार, बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अनुकूल हवामान तयार होत असून, यामुळे देशाच्या उत्तर भागात पावसाचे आगमन अपेक्षित आहे. केरळपासून सुरुवात करून मान्सून पश्चिम, उत्तर-पश्चिम आणि पूर्व भागाकडे प्रवास करत असतो. परंतु यंदा त्याची गती खंडित झाली आहे. पश्चिम बंगालमधून मिळणाऱ्या बळामुळे लवकरच संपूर्ण भारतात तो सक्रिय होईल, असा अंदाज आहे.
शेतकऱ्यांसाठी हे फारच नाजूक टप्प्याचे दिवस आहेत. योग्यवेळी पाऊस न झाल्यास पेरणीची कामे रखडतात आणि दुबार पेरणीचा धोका निर्माण होतो. सध्या अनेक भागांतील शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत असून, पावसाच्या लहरीपणामुळे त्यांच्या चिंतेत भर पडत आहे. धरणे, तलाव, नद्या, विहिरी आणि इंधनविहिरी हे सध्याचे पाण्याचे मुख्य स्रोत असले तरीही खरीप शेतीसाठी नैसर्गिक पावसावरच मोठ्या प्रमाणात विसंबून राहावे लागते.
त्यामुळे यावर्षी मान्सूनचा पुढील प्रवास कसा होतो, यावर अनेकांचे भवितव्य ठरणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे ११ जूननंतर पावसाचा जोर वाढल्यास शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित होतील. तोपर्यंत मात्र, शेतकऱ्यांनी संयमाने आणि शहाणपणाने निर्णय घ्यावा, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.