राज्यातील शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडवण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आता इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना मूलभूत लष्करी प्रशिक्षण दिलं जाणार आहे. शालेय वयातच राष्ट्रप्रेम, शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्ती या गुणांचं बाळकडू मिळावं, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नाशिकमधील एका जाहीर कार्यक्रमात या योजनेची घोषणा केली. त्यांनी स्पष्ट केलं की, विद्यार्थ्यांमध्ये ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना बाळकवण्याचा हेतू या मागे आहे.
या उपक्रमासाठी माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, एनसीसी, स्काऊट-गाईड्स यांचा सहभाग असणार आहे. विशेष म्हणजे, राज्यातील सुमारे 2.5 लाख माजी सैनिकांची मदत घेतली जाणार असून, त्यांच्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. शिस्त, नियमित व्यायाम, आत्मसंयम आणि देशप्रेम या मूल्यांचं शिक्षण लहान वयातच दिलं गेल्यास पुढील पिढी अधिक जबाबदार नागरिक म्हणून घडेल, असा विश्वास भुसे यांनी व्यक्त केला.
या निर्णयामागे सिंगापूरमधील शिक्षण व्यवस्थेचा प्रभाव देखील आहे. अलीकडेच राज्यातील 48 शिक्षकांना सिंगापूरच्या अभ्यास दौऱ्यावर पाठवण्यात आलं होतं. तिथे शाळांमध्ये राष्ट्रप्रेमाचा पाया पहिल्याच इयत्तेपासून घालण्यात येतो, हे निरीक्षण त्यांनी नोंदवलं. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही ‘राष्ट्र प्रथम’ संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
या उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष दिलं जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचं हेल्थ कार्ड तयार करून दरवर्षी वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे फक्त मानसिकच नव्हे तर शारीरिक आरोग्यालाही चालना मिळेल.
एकूणच, शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय मूल्यं, शिस्त आणि उत्तम आरोग्य यांचा समतोल साधत, त्यांना सर्वांगिण घडवण्याचा सरकारचा हा उपक्रम निश्चितच एक सकारात्मक पाऊल ठरू शकतो.