चित्रपटसृष्टीत संयम राखणारे आणि कुटुंबासाठी भक्कमपणे उभे राहणारे अभिनेते म्हणून ओळख असलेल्या सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांनी अलीकडेच आपल्या मुलगा अहान शेट्टी याच्याविरोधात सुरू असलेल्या ट्रोलिंग आणि अफवांवर खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे.
‘बॉर्डर 2’ (Boarder 2) या महत्त्वाकांक्षी युद्धपटात अहानची भूमिका निश्चित झाल्यापासून, त्याच्यावर विविध माध्यमांतून टीका केली जात आहे. चित्रपटासाठी इतर अनेक ऑफर्स नाकारल्यानंतरही काही मंडळींनी त्याच्यावर आरोपांचे तुकडे उडवायला सुरुवात केली आहे.
‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाले, “मी अहानला स्पष्ट सांगितलं हा चित्रपट तुझ्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट आहे. इतर प्रोजेक्ट्स येतील, पण ‘बॉर्डर 2’साठी तू जीव ओतून काम कर. कारण हा चित्रपट तुला आणि मलाही भारतीय प्रेक्षकांच्या हृदयात टिकवून ठेवेल. प्रत्येक 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला हा सिनेमा लोकांच्या आठवणीत राहील.”
चित्रपटासाठी झोकून देण्याचा निर्णय घेतल्यानंतर अहानला काही मोठ्या प्रोजेक्ट्समधून डावलण्यात आले. त्याच्यावर “अहंकारी आहे”, “महागडे बॉडीगार्ड्स घेऊन फिरतो”, अशा निराधार अफवा पसरवल्या गेल्या. सुनील शेट्टी म्हणतात, “या सगळ्या अफवांचा हेतू एकच – त्याला बदनाम करून इतरांच्या प्रोजेक्ट्समध्ये जागा मिळवायची.” या गोष्टी आता जर आणखी वाढल्या, तर सुनील शेट्टी यांनी ठाम शब्दांत सांगितलं “मी पत्रकार परिषद घेईन आणि सगळ्या खोट्या बातम्यांची माहिती सर्वांसमोर आणेन. कोणी कितीही मोठा असो, मी त्यांचे चिथडे उडवेन.”
‘बॉर्डर 2’ हा 1997 मध्ये आलेल्या ‘बॉर्डर’ चित्रपटाचा उत्तराधिकारी आहे. देशप्रेम, युद्धभूमीतील बलिदान आणि सैनिकांची भावना यांचं सशक्त चित्रण यात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, दिलजित दोसांझ यांच्यासोबत अहान शेट्टी देखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. चित्रपट प्रजासत्ताक दिन 2026 च्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
‘बॉर्डर 2’ दिग्दर्शित आहे अनुराग सिंग यांच्याकडून, जे ‘Kesari’ सारख्या देशभक्तिपर चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. यामुळेच या प्रोजेक्टबाबत संपूर्ण टीम विशेष मेहनत घेत आहे.
सुनील शेट्टींची ही प्रतिक्रिया केवळ वडिलांच्या भूमिकेतून नव्हे, तर एक जबाबदार अभिनेते आणि कुटुंबवत्सल व्यक्ती म्हणूनही महत्वाची आहे. अहानसारखा नवोदित अभिनेता जेव्हा समर्पणाने एखाद्या मोठ्या प्रकल्पात काम करतो, तेव्हा त्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन द्यायला हवं – दुर्बल करणाऱ्या अफवा नाही.