भारताने नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जशास तसे उत्तर देत ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ नष्ट केले आहेत. या कारवाईत सुमारे 100 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या धडक कारवाईमुळे संपूर्ण देशात भारतीय सैन्याचे कौतुक होत आहे आणि ‘सिंदूर’ या शब्दाचा अनोखा अर्थ नव्याने समोर आला आहे.
‘सिंदूर’ म्हणजे विवाहित स्त्रीच्या मस्तकी लावला जाणारा साजशृंगाराचा एक भाग, जो तिच्या सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. पण अनेकांना याचा खरा उगम माहित नसतो. हा सिंदूर काही रासायनिक प्रक्रियेतून तयार होत नाही, तर तो एका खास वनस्पतीपासून मिळतो.
‘कुमकुम ट्री’ किंवा ‘बिक्सा ओरेलाना’ या झाडाला मराठीत ‘कामील’ म्हणतात. या झाडाच्या फळांमधील बिया दळून नैसर्गिक सिंदूर तयार केला जातो. हे झाड प्रामुख्याने महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेशात उगम पावते, तसेच दक्षिण अमेरिकेतही याची लागवड होते. सुरुवातीला याच्या फळांना हिरवट रंग असतो, जो नंतर गडद लाल होतो. याच फळातून मिळणाऱ्या बियांमुळे हा हिरवळीतून आलेला लाल रंग स्त्रीसौभाग्याचे प्रतीक ठरतो.
विशेष म्हणजे या बियांपासून केवळ सिंदूरच नाही, तर हर्बल लिपस्टिक, खाद्य रंग आणि औषधी उपयोगासाठीही घटक तयार होतात.
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाद्वारे पाकिस्तानला केवळ सैनिकी ताकदीचा नाही, तर आपल्या सांस्कृतिक मूल्यांचा आणि स्त्रीच्या सौभाग्याचा अर्थही सडेतोडपणे समजावून सांगितला आहे.