पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) BIMSTEC समिटमध्ये सहभागी होण्यासाठी थायलंडला पोहोचले (BIMSTEC Summit in Thailand) आहे. या परिषदेत बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान, म्यानमार देखील सहभागी आहेत. अशात तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही BIMSTEC नेमके आहे तरी काय? या संघटनेची स्थापना कधी झाली होती? भारतासाठी याचे काय महत्व आहे? किती देश या संघटनेचे सदस्य आहेत? आज याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या..
BIMSTEC संघटनेचे पूर्ण नाव Bay of Bengal Initiative for multi sectoral Technical and Economic Cooperation असे आहे. या संघटनेचे दोन दिवसांचे शिखर संमेलन बँकॉक येथे होत आहे. म्यानमार आणि थायलंडमध्ये जोरदार भूकंप होऊन मोठे नुकसान झालेले असताना ही परिषद होत आहे. या देशांना मदत म्हणून भारताने ऑपरेशन ब्रह्मा सुरू केले आहे. भारतीय सैनिक मदतीसाठी येथे तत्पर आहेत. या शिखर संमेलनाच्या निमित्ताने या संघटनेची काही महत्त्वाची माहिती जाणून घेऊ..
Narendra Modi BIMSTEC म्हणजे काय? किती देश सदस्य..
क्षेत्रीय सहकार्याच्या उद्देशाने या संघटनेची 6 जून 1997 रोजी स्थापना करण्यात आली होती. या संघटनेत सध्या भारत, नेपाळ, बांगलादेश, भूतान, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड हे सात सदस्य देश आहेत. सुरुवातीला या संघटनेत (BIST -EC) भारत, श्रीलंका, बांगलादेश आणि थायलंड हे चारच सदस्य होते. नंतर म्यानमार सदस्य बनला. त्यामुळे संघटनेचे नाव बदलून BIMST-EC असे करण्यात आले. यानंतर 2004 मध्ये नेपाळ आणि भूतान देखील सदस्य बनले त्यावेळी संघटनेचे नाव BIMSTEC असे करण्यात आले.
Narendra Modi संघटनेचा मुख्य उद्देश काय
बंगालच्या खाडीशी जोडलेल्या देशांचा आर्थिक विकास परस्पर सहकार्य, संकटांना मिळून तोंड देण्याची रणनीती, आपसी हितांवर चर्चा असा उद्देश या संघटनेचा होता. सहकार्य आणि समानतेची भावना निर्माण करण्याबरोबरच शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात एकमेकांची मदत करणे हाही उद्देश आहे. या उद्देशांनुसारच संघटनेतील सदस्य देश वाटचाल करत आहेत.
Narendra Modi जगासाठीही BIMSTEC महत्त्वाचा
सदस्य देशांसाठी संघटना महत्त्वाचीच आहे पण जगासाठी देखील याचे महत्व आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार जगातील एकूण लोकसंख्येच्या 22 टक्के लोकसंख्या याच सात देशांत राहते. जगातील एकूण व्यापाराचा एक चतुर्थांश हिस्सा बंगालच्या खाडीतून जातो. संघटनेतील सदस्य देशांचा जीडीपी जवळपास 4 ट्रिलियन डॉलर्स इतका आहे. बिम्सटेक संघटनेचे स्थायी सचिवालय बांग्लादेशची राजधानी ढाकामध्ये आहे. 2014 मध्ये या सचिवालयाची स्थापना करण्यात आली होती. या साचिवलयासाठी येणाऱ्या एकूण खर्चापैकी 32 टक्के खर्च भारताकडून दिला जातो.
Narendra Modi भारतासाठी बिमस्टेकचे काय महत्व
भारताच्या दृष्टीने सुद्धा या संघटनेचे अनन्यसाधारण महत्व आहे. नेबरहुड फर्स्ट, ऍक्ट ईस्ट आणि भारताच्या पूर्वोत्तर राज्यांच्या विकासाला या संघटनेच्या माध्यमातून चालना मिळते. भारताबरोबर शेजारी देशांचे संबंध बिघडत चालल्याने सार्क संघटनेचे महत्त्व (SAARC) कमी होत चालले आहे. त्यामुळे बिमस्टेकचे भारतासाठी महत्त्व आणखी वाढले आहे.
या संघटनेचे आतापर्यंत सहा शिखर संमेलने झाली आहेत. सहावे संमेलन थायलंडमध्ये होत आहे. पहिले BIMSTEC व्यापार शिखर संमेलन दिल्लीत आयोजित करण्यात आले होते. या संघटनेचे अध्यक्षपद अल्फाबेटिकल ऑर्डर पद्धतीने दिले जाते. आतापर्यंत भारताला दोन वेळा, बांग्लादेशला दोन वेळा, श्रीलंका आणि म्यानमारला दोन वेळा तर थायलंडला एकदा अध्यक्षपद मिळाले आहे.